Thursday, 11 June 2020

योगविज्ञान शवासन भाग १

Sunday 7th June 2020

🧘🏻‍♂योग विज्ञान शृंखला🧘‍♀
✒️.....डॉ. शरद रामढवे.
           (कान,नाक,घसा तज्ञ)
शवासन विज्ञान भाग १
     शवासन पाठीवर झोपून केले जाते.कारण शरीर जमिनीशी      समांतर झाल्याने गुरुवाकार्षणाचा परिणाम शरिरावर कमीत कमी होतो. ज्यावेळी मनुष्य बैठक स्थितीत किंवा दंड स्थितीत असतो, त्यावेळी ती स्थिती राखण्यासाठी त्याला गुरुत्वाकर्षणाविरुद्ध लढावे लागते. बैठक स्थितीत गुरुत्वाकर्षण त्याला खाली खेचत असते, तर पाठीचे स्नायु बैठक स्थितीत बसण्यास मदत करीत असतात, त्यामुळे शरिराचा तोलही सांभाळला जातो. यासाठी जे विशिष्ट स्नायुचे आकुंचन होत असते, त्यासाठी प्रति मिनीट साधारण चार उष्मांकाची (Calaries) गरज भासते. म्हणून बराच वेळ बसल्याने मनुष्य थकतो. ज्यावेळी मनुष्य आडवा होतो, त्यावेळी त्या पाठीच्या स्नायुना आता आकुंचन व्हावे लागत नाही व आडवे झाले की, उष्मांकाची गरज प्रति मिनीट कमी भासु लागते. तसेच जाणीवपूर्वक शरिरातील सर्व स्नायुंचे  शिथिलीकरण (Active Relaxation) केल्याने उष्णिकांची गरज आणखी कमी म्हणजे १-२ कॅलरीज प्रति मिनिट पूर्ण होऊ लागते. बी.एम.आर. (Basal Metabolic rate) ही कमी होतो. त्यामुळे मानसिक स्थिरता येते व श्वासावरील मनाची सजगता चांगली साधता येते. परिणामी इकडे तिकडे जाणारे विचार कमी होऊन मन शांत होऊ लागते.
       हृदयाचे स्पंदन आणि श्वास यांचे जवळचे नाते आहे. त्यामुळे जसे प्रति मिनिट श्वास संथ, मंद व लयबध्य होईल तसे नाडीचे (हृदयाचे) ठोके प्रति मिनिट कमी पडू लागतात.
       शवासनाने रक्तदाब नियंत्रित होतो. रक्तदाब वाढलेला असेल तर तो नैसर्गिक पध्दतीने कमी होऊ शकतो. साधारणपणे ८ ते १० मिनिट चांगल्या प्रकारे शवासन
करता आले तर श्वसनाचा वेग साधारण १५ ते २० प्रति मिनिट असतो, तो ८ ते १२ पर्यंत खाली येतो. नाडीचे ठोके ७० ते ९० पासून ५० ते ६० पर्यंत, तर रक्तदाब ५ ते १० मि.मि. मर्क्युरीने खाली येतो. त्यामुळे हृदयाला विश्रांती मिळते व शिथलीकरणाचा परिणाम जाणवू लागतो.
        शवासनाने मन शांत व प्रसन्न वाटते. कारण शवासनात ई.ई.जी. (EEG) काढला तर त्यामध्ये अल्फा मेंदू तरंग (Brain waves) आढळून येतात, हे अल्फा
मेंदू तरंग मानसिक शांती व मेंदूच्या प्रसन्नतेचे प्रतिक आहे. शवासनामुळे मन व मेंदू शांत शिथिल व तणावरहीत होतो.
       विज्ञानाने सिध्द झालेले आहे की, सततच्या मानसिक तणावामुळे रक्तदाब, हृदयविकार, पोटांचे विकार (Acidity, ulcerative Colitis) तसेच (Spondylosis, Diabetes, Migraine, Asthma) या सारखे आजार होतात. औषधाबरोबर मन शांतीची गरज असते. ती मनःशांती औषधाने मिळू शकत नाही. गुंगीच्या औषधाने (Sedative व Tranqultsers) मेंदू बधीर होतो, शांत होत नाही व  अशा औषधांचे दिर्घकालीन परिणाम वाईटच होतात. शवासनाने मन शांत होते. त्यामुळे अशा विविध तणाव निर्मित आजारामध्ये नियमित शवासन एक उपचार म्हणून उपयोगी पडू शकतो.
      तणावग्रस्त स्थितीत मेंदूला रक्ताची अधिक गरज असते. साधारणपणे मन ज्यावेळी शांत असते. त्यावेळी रक्ताची गरज २० टक्के असते. पण ज्यावेळी अति तणावाची स्थिती निर्माण होते त्यावेळी हीच मेंदूची रक्ताची गरज २५ ते ३० टक्क्यापर्यंत वाढते. हे मेंदूला जादा लागणारे रक्त मेंदू इतर अवयवाकडून काढून घेतो. विशेषतः जठर, मोठे आतडे, मणक्याभोवतीचे स्नायु यांचे रक्त मेंदूकडे वर्ग होते. त्यामुळे कांही अवयवांचा रक्त पुरवठा कमी होऊ शकतो. जर ही तणाव स्थिती अशीच वारंवार राहू लागली किंवा दिर्घकाळ राहिली तर त्या अवयवांची कार्यक्षमता कमी होऊ लागते आणि मग ऍसिडीटी, अल्सर, मानदुखी, पाठदुखी, रक्तदाब, मधुमेह यासारखे विकार होऊ लागतात.
       शवासनामध्ये आडवे झाल्यामुळे मेंदुचे कार्य मुळातच कमी झालेले असते व मन शांत झाल्यामुळे मेंदुला मिळणाऱ्या २० टक्के रक्ताची गरज भासत नाही. फक्त १२ ते १५ टक्के रक्त पुरेसे होते. तेव्हा हे उरलेले ५ ते ८ टक्के रक्त बाकी अवयवांना बोनस दिल्याप्रमाणे मिळू लागते. त्यामुळे बाकी अवयवांची कार्यक्षमता सुधारु लागते. म्हणून रक्तदाब, हृदयविकार, निद्रानाश, स्पाँडिलायसिस, मायग्रेन, मधुमेह या मानसिक तणावाशी निगडीत आजारामध्ये शवासनाला अनन्य साधारण महत्त्व आहे.
     शवासनामुळे मृत्यूच्या भीतीवर विजय मिळवता येतो. अप्रत्यक्षरित्या शवासनात आपण त्याचा अनुभव घेत असतो. शवासन अवस्था म्हणजे गाढ़शांततेचा (Feeling of deep silence) अनुभव आणि मृत्यू म्हणजे ही एक प्रकारची शांतता, परंतु कायमची.

Sharadyogvigyan.blogspot.com

No comments:

Post a Comment