Thursday, 4 June 2020

योग विज्ञान ध्यान भाग ४


Monday 24 May 2020

🧘🏻‍♂योग विज्ञान शृंखला🧘‍♀
✒️.....डॉ. शरद रामढवे.
           (कान,नाक,घसा तज्ञ)
ध्यान भाग ४
करुणा ध्यान (Compassion Meditation)  हे तिसऱ्या प्रकारचे ध्यान,जे आपल्या सगळ्या प्रार्थनामध्ये आहे.आपण प्रार्थना म्हणतो," सर्वे भवन्तु सुखिनहै। सर्वे संतु निरामयः।।" हे करुणाध्यान आहे.यामध्ये सर्वांचे भले होवो,सर्व निरोगी होवो हा विचार आणि भावना मनात कांही वेळ धरून ठेवायची आणि त्यावर मन एकाग्र करायचे.याचा उपयोग असा होतो की, आपल्यापैकी बहुतांशी लोकांचा मेंदू हा नकारात्मकतेकडे झुकलेला असतो. काही जणानांच असे वाटते की, माझ्या मनातच भितीचे विचार का येतात? कोणी बाहेर गेलं अणि त्याला येण्यासाठी थोडा उशीर झाला की, पहिल्यांदा आपल्या मनात अक्सिडेंटचाच विचार येतो. असे भितीचे विचार येणे हे स्वाभाविक आहे.शास्त्रज्ञांना असे कळले आहे की, आपला मेंदू हा नकारात्मक घटना जाणण्यास जास्त उत्सुक असतो. मानसशास्त्रानुसार छोट्या छोट्या गोष्टींची भिती असणं हे जन्मल्यापासून उपजतच असतं आणि थोडीफार मिती हे जिवंत राहण्यासाठी आवश्यकही असते. ही भिती वाजवीपेक्षा जास्त किंवा अतिशयोक्ती असेल तर चांगल्या आणि सकारात्मक आठवणी मनात धरून ठेवण्यास हव्यात. तसेच सर्वांचे चांगले होवो, कल्याण होवो असे चांगले विचार मनात धरून ठेवायला हवेत आणि असे सकारात्मक विचार मनात धरून ठेवणे म्हणजे तिसऱ्या प्रकारचे करुणा ध्यान.
       प्रार्थना तोंडाने म्हणतांना मनात त्यातील भाव निर्माण करा. सर्व प्राणी सुखी होवोत. आनंदी, होवोत, निरोगी होवोत, सर्वांचे मंगल होवो, कल्याण होवो अशा भावना काही काळ मनामध्ये ठेवणे, मनामध्ये आनंद, प्रेम, करुणा निर्माण करणे हेच करुणा ध्यान आहे. ज्ञानोबा माऊलींचे पसायदान अशाच अर्थाचे आहे. बौध्द संस्कृतीमध्ये भवतु सब्ब मंगलम् अशी प्रार्थना केली जाते. हिंदू धर्मामध्ये गायत्री मंत्र म्हंटला जातो. अशा प्रार्थना साधारण सर्वच धर्मात सांगितलेल्या आहेत.
         मन आणि मेंदू एकमेकावर परिणाम करतात. म्हणजेच मनाचा परिणाम मेंदूवर होतो. हे संशोधनात लक्षात आले आहे. मनातील भावना प्रयत्नपूर्वक बदलल्या, नैराश्य, क्रोध, मत्सर याऐवजी मनात प्रेम, करुणा, दया असे भाव निर्माण केले तर त्यामुळे मेंदू आणि मेंदूतील रसायने बदलतात. मेंदूतील सेरेटोनीन (Seretonin) हे रसायन वाढते ज्यामुळे औदासिन्य किंवा डिप्रेशन कमी होते. मेंदूचा डावा प्री-फ्रेंन्टल कॉर्टेक्स (Left prefrontal cortex) हा भाग अधिक सक्रीय होतो.
          मेंदूच्या संशोधनातून अजून एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे आपला मेंदू दुःखद प्रसंग किंवा नकारात्मक गोष्ट ठळकपणे लक्षात ठेवतो, तुमची कोणत्याही व्यक्तिशी झालेली भांडणे किंवा कटू प्रसंग किंवा मानहानीचा प्रसंग सहजपणे आणि लगेच आठवतात त्याचे कारण मानवाची उत्क्रांती होत असतांना स्वत:च्या संरक्षणासाठी धोक्याचे किंवा भितीदायक प्रसंग कायमचे लक्षात राहिल्याने आपले पूर्वज, आदिमानव योग्य ती काळजी घेवू शकत होते. विपरीत परिस्थिती, संकटे टाळण्यासाठी अशी संकटे आणि धोके ध्यानात राहणे आवश्यक होते. त्यासाठी असे प्रसंग माणसाच्या अमायग्डला (Amygdala) आणि हिपोकॅम्पस (Hippocampus) या मेंदूच्या भागात कायमचे कोरले जातात. त्यामुळेच वाघाची डरकाळी ऐकून माणूस पळत सुटत होता. म्हणूनच मरणाची भिती ही मानवास उपजतच जन्मापासूनच असते. ही आपल्या मेंदूची जडणघडण उत्क्रांतीच्या काळात उपयोगी ठरते. परंतु तीच जडणघडण आज नैराश्य आणि औदासिन्य वाढवते आहे. दुःखद प्रसंग, कलह, संकटे आपल्या स्मरणातून लवकर जात नाहीत. आनंदाचे, सुखाचे क्षण मात्र आपण पटकन विसरुन जातो. उत्क्रांतीच्या दृष्टीने टिकून राहण्यासाठी आनंद लक्षात राहणे फारसे महत्वाचे नव्हते. त्यामुळे त्यासाठी कोणतीही विशेष व्यवस्था मेंदूत नाही. त्यामुळे सुख विसरले जाते
आणि दुःख कायमचे लक्षात राहते. म्हणूनच आनंदाचा, सुखाचा, प्रेमाचा अनुभव, त्याचा कालावधी मनात वाढवावा लागतो. करुणाध्यानाने नेमके हेच केले जाते. आनंद,प्रेम, करुणा अशा भावनांचे मनात काही काळ धारण केले जाते. त्याचा परिणाम मेंदूवर आणि शरीराच्या आरोग्यावर चांगला होतो असे संशोधन एमोरी विद्यापिठाच्या (Emory University) मानसरोग विभागाने केले आहे.
'     ताणतणावामध्ये माणूस युध्दस्थितीत असतो. त्यावेळी त्याच्या रक्तातील कॉर्टीसोल (Cortisol) आणि इंटरल्युकीन - ६ (Interlukin - 6) हे रसायन वाढलेले असते. हे रायसन (Raison) यांच्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे. या रसायनामुळे रक्त वाहिन्यांचे आजार, मधुमेह, स्मृतिभंश आणि औदासिन्य यासारखे आजार होऊ शकतात. तसेच रोग प्रतिकारक शक्ति दुबळी होते. करुणाध्यानाने युध्दस्थितीतील ही रसायने कमी होतात हे संशोधनाने सिध्द केले आहे
       ह्या करुणा ध्यानाचा परिणाम म्हणून आपला नकारात्मक (Negative bias) मेंदू हळूहळू बदलायला लागतो. या ध्यानाचा परिणाम म्हणून आपल्या मेंदू मधून
सिरोटोनिन, डोपामिन हे निर्माण करणारे रसायन अधिक पाझरतात. त्यामुळे ही डिप्रेशन किंवा उदासिनता वरील एक उपचार पध्दती आहे. कारण डिप्रेशन मध्ये हीच सिरोटोनिन, डोपामीन ही रसायने कमी झालेली असतात.

sharadyogvigyan.blogspot.com

3 comments:

  1. ध्यानाचे खुप महत्त्व या मधे सांगितलेले आहे.आज या तरुण पिढी ला खुप महत्त्वाचे असणारे मुद्दे या मधे आहेत.

    ReplyDelete