Thursday, 4 June 2020

योग विज्ञान ध्यान भाग ८

Tuesday 26 May 2020

🧘🏻‍♂योग विज्ञान शृंखला🧘‍♀
✒️.....डॉ. शरद रामढवे.
           (कान,नाक,घसा तज्ञ)
ध्यान  भाग ८
मेंदूलहरी आणि ध्यान :
मानवी मेंदूमध्ये अब्जावधी मेंदूपेशी म्हणजे न्यूरॉन
असतात. एक तिच्या शाखांच्या माध्यमातून दुसऱ्या पेशीशी जोडलेली असते.या पेशीमधून विद्यूतधारा वाहत असते.पायाला काटा टोचताक्षणी मेंदूला ते समजते आणि हात तो काटा काढायला जातो. हे सर्व या पेशींमधून वाहणाऱ्या विद्यूतधारांमुळेच घडते. ही धारा सलग नसते. सलग धारा काही अंतरावर क्षीण होऊ शकते. तसे होऊनये म्हणून दोन मेंदूपेशींच्या मध्ये सूक्ष्म फट असते. त्या मधल्या जागेत मेंदू रसायने म्हणजेच न्यूरोट्रान्समीटर असतात. ते मागील पेशीतील संदेश पुढील पेशींपर्यंत नेतात.अशा प्रकारे संदेश वाहन होते.
       आपल्या वैचारिक मेंदूतील विद्युतधारा, त्यांची वेव्हलेंथ आणि फ्रिक्वेन्सी मोजता येते. त्यांचा आलेख काढता येतो. या आलेखालाच इलेक्ट्रोएनसेफेलो ग्राफ (EEG) म्हणतात. या आलेखावरून मेंदूतील लहरींचे वारंवारते (फ्रिक्वेन्सी) वरुन पाच प्रकार पडतात. सर्वात संथ लहरी, डेल्टा लहरी (0 ते 4 Hz) या गाढ झोपेत असताना आढळतात. डेल्टापेक्षा गतिमान थिटालहरी (4 ते 8 Hz) या झोपेच्या काळात असतात किंवा नवीन कल्पना सुचताना आढळतात. अल्फा लहरी (8 ते 12 Hz) च्या जेव्हा आपण डोळे मिटून शांत बसतो त्यावेळी प्रमाण वाढते. जेव्हा मनात पुनःपुन्हा तेच
विचार येत असतात आणि तो बेचैन होतो त्यावेळी त्याच्या मेंदूत बीटा लहरी (12 ते 40 Hz.) जास्त प्रमाणात असतात. तो शांत स्थितीत राहू शकत नाही. समस्येवर उपाय शोधत असतानाही मेंदूत बीटा लहरी असतात. गॅमा लहरी
 (40 ते100 Hz) ह्या अती वेगवान असतात. जागृतावस्थेत तन्मय  होवून शिकत असताना तसेच स्वप्नावस्थेत ह्या गॅमा लहरी जास्त असतात. ह्यावेळी माणूस उत्तेजित आणि उत्साही
असतो, पण अती झाल्यास अस्वस्थतेचे लक्षण असू शकते. या लहरी मेंदूच्या थैलॅमस या भागात निर्माण होतात व सर्व मेंदूत पसरतात.
       आपल्या सजगतेचे मुख्य केंद्र थैलेमस मध्ये असते. तेथे अतिशय अल्प इजा झाल्यास माणूस सजग राहू शकत नाही. तो कोमामध्ये जातो. सजगला आणि तन्मयता असतांना थेलेमसमधून मेंदूच्या सर्व भागात वेगवान लहरी पसरतात. म्हणून प्रत्येक योग क्रिया सजगतेने केल्यामुळे मेंदूवर त्याचा सकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे योगामध्ये सजगतेला जास्त महत्त्व दिले जाते.
       ध्यानामुळे अल्फा लहरी वाढतात आणि शांतता स्थिती निर्माण होते. आणि हे तणाव व्यवस्थापनाचे उत्तम साधन होऊ शकते.
        ध्यान हे फक्त साधू आणि योगी यांनीच करावे असे नसून,सर्व सामान्य संसारी माणसांनीही ध्यान करायला हवे. सर्वसामान्य माणसाने आयुष्य अधिक आनंदी आणि प्रभावी करण्याचे हे एक साधन आहे. हे ध्यान शिकण्यासाठी कोणत्याही देवांवर किंवा ग्रंथावर श्रद्धा आवश्यक नसून, नास्तिक किंवा अज्ञेयवादी देखील हे ध्यान करू शकतात. भावातीत ध्यान (करुणाध्यान) हे आयुष्य जगण्याची कला शिकवते. ह्या फ़क्त ध्यानामुळे सजगता वाढते, आपला आनंद बाह्य परिस्थितीवर अवलंबून नसतो, हे समजते. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आनंदी राहता येते आणि तसे राहिले तरच सकारात्मक दृष्टीकोन कायम राहतो आणि आपण करीत असलेले काम अधिक प्रभावी होते. ध्यानाचे धडे शाळेतील विद्यार्थ्यांनाही देण्याची गरज आहे. ज्यामुळे त्यांची एकाग्रता, सर्जनशीलता, ग्रहणक्षमता वाढून परिक्षेतील गुण वाढतील. तसेच विद्यार्थ्यांचे भावनिक संतुलन चांगले राहील. त्यांच्यातील तणाव, आपापसातील भांडणे आणि चंचलता कमी होईल. ध्यानाविषयीचे गैरसमज आणि पूर्वग्रह दूर करून त्याचा अभ्यास शाळा-कॉलेजमध्ये सुरू करायला हवा. जे की एक मनाच्याविकासाचे साधन आहे .

sharadyogvigyan.blogspot.com




3 comments: